यशाच्या पंचसूत्रीने जीवन यशस्वी करा -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

                                                                


यशाच्या पंचसूत्रीने जीवन यशस्वी करा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


नंदुरबार - शिस्त, परिश्रम, उद्दिष्ट, मातृभाषेचे ज्ञान आणि गुरुजनांचा आदर या पंचसूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपले जीवन यशस्वी करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


नंदुरबार येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार हिना गावित, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत उपस्थित होते.


राज्यपाल म्हणाले, यश संपादन करण्यासाठी जीवनाला दिशा हवी. विद्यार्थ्यांनी निश्चित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केल्यास यश हमखास मिळते. त्याला परिश्रमाची जोड आवश्यक असल्याने अध्ययनावर लक्ष केंद्रित करा व शालेय जीवनात मोबाईलपासून दूर राहा. आई, वडील आणि गुरुजनांविषयी आदरभाव बाळगा आणि शिक्षकांवर श्रद्धा असू द्या. आपल्या भाषेचे ज्ञान असल्यास देशासाठी उत्तम कार्य करू शकाल असे त्यांनी सांगितले. रुपाली पावरा हिने 'राज्यपाल होण्यासाठी काय करावे' असे विचारले असता तुम्ही ध्येयनिष्ठ जीवन जगल्यास राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतात, असे श्री. कोश्यारी म्हणाले. दरम्यान एकलव्य विद्यालयाने अनेक पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.


जळखे येथील आश्रमशाळेला भेट


राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जळखे येथे डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित, राजेश गावित, शिरीषकुमार नाईक आदी उपस्थित होते. राज्यपाल महोदयांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील अनुभव सांगितले. शालेय शिस्तीला महत्व देण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी देशाचा गौरव वाढविण्यासाठी चांगले शिक्षण घ्यावे असेही ते म्हणाले.


दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी नावली आश्रमशाळेला भेट देऊन डिजिटल क्लासरूमची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन घेताना त्यांच्या शिक्षणाविषयी चर्चा केली. परतीच्या प्रवासात वाटेत शाळेतील लहान बालके दिसल्यावर त्यांनी वाहन थांबवून मुलांना चॉकलेटही वाटले.


नेसू परिसर शेती उत्पादक कंपनीला भेट


राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सागाळी येथील नेसू परिसर शेती उत्पादक कंपनीच्या राईस मिलला भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक उत्पादनाचा उपयोग करून राईस मिलचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत आहे. शेतीला पशुपालनाची जोड दिल्यास अधिक लाभ होईल. व्यसनापासून दूर रहात श्रमप्रतिष्ठेला महत्व देणे गरजेचे आहे. राईस मिल चालविताना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


यानंतर राज्यपाल महोदयांनी खांडबारा येथील रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णांशी चर्चा करताना मिळणाऱ्या औषधोपचारविषयी माहिती घेतली. रुग्णालयातील स्वच्छतेविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.